Sunday, April 19, 2020

ऐहिक मूल्ये मनःकल्पित!!

ऐहिक जीवनमूल्ये वस्तुतः मनःकल्पित असतात. त्यांना सत्याचा पाया नसतो. हे विचार साधकाला निश्चित उपयुक्त आहेत. परमार्थ हेच शिकवतो. देवाशिवाय कशालाही जीवनमूल्य म्हणता येणार नाही. या मुख्य जीवनमूल्याच्या प्राप्तीला इतर गोष्टींचा ज्याप्रमाणात उपयोग होतो, तितकेच त्यांना महत्त्व, अधिक नाही. अधिक महत्त्व आपण अस्मितेमुळे देतो. ते देऊ नये, हेच विवेकाचे सांगणे आहे.

असत्य जीवनमूल्यांना महत्त्व देण्याच्या मुळाशी भीती - एकाकीपणाची, आंतरिक पोकळीची - भीती आहे. काही कारणाने मन अस्वस्थ झाले - मित्र चांगला न वागल्याने, कोणी निंदा केल्याने, कार्यात यश न आल्याने - तर आत्मनिरीक्षण केल्यास वरील सत्यता पटते. त्यावेळेपुरते "या गोष्टीमुळे सर्वनाश झाला" अशी वृत्ती भ्रमाने निर्माण होते. काही वेळाने पुनः सर्व पूर्ववत होते. कारण ती वृत्ती भ्रमच असते. तितका काळ मात्र व्यर्थ जातो, दुःख होते. त्याबरोबरच अशा प्रत्येक अनुभवाने तो भ्रम बळावतो;

म्हणून सतत आत्मनिरीक्षण करून, स्वतःची अस्मिताच काढून टाकावी. त्याचे मुख्य साधन नामस्मरण व स्वरूपानुसंधान; त्यावाचून आत्मदर्शन नाही; देहतादात्म्याचा नाश नाही!

~ पूज्य काकासाहेब तुळपुळे (डोळस नामसाधन)

No comments:

Post a Comment